Tuesday, 1 March 2011

काही महत्वाच्या कविता...


या काही लाडक्या कविता...

त्यातही विशेषतः पहिल्या तीन या मला "निर्माण ब्लॉग" या अनुदिनीवर मिळाल्या... आणि त्यापुढील दोन "मालकंस" व "माणिक मोती" या ब्लॉग वर...
पैकी "निर्माण" हा ब्लॉग प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि त्यावर आत्मचिंतन करावे इतका अप्रतिम आहे... 

त्याला इलाज नाही

धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

-विंदा करंदीकर 


एवढे लक्षात ठेवा

उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा

ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी
ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा

जाणती जे सांगती ते ऐकूनी घ्यावे सदा
मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा

चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता
उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा

विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी
सीमा तयाला असावी एवढे लक्षात ठेवा

दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले
तो गुरूचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा

माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वत:ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा

-विंदा करंदीकर
-------------------------------------------------------------

ते नावं बदलताहेत

ते नावं बदलताहेत
शहरांची घरांची विद्यापीठांची विमानतळांची
ही लागण वाढत जाईल
ते बदलतील नावं शब्दांची

भुकेला अन्न, तहानेला पाणी म्हणतील
माणसांना ग्राहक, मॉलला मंदिर-मस्जीद म्हणतील
घराला वेटींगरुम, पोराला इन्व्हेस्टमेंट म्हणतील

आत्महत्येला मुक्ती, वनवासाला संन्यास म्हणतील
गांधीला गोडसे, शिवीला ओवी, पुस्तकाला बॉम्ब म्हणतील

चला, आपणही त्यांच्या आरत्या ओवाळू
त्यांची पूजा करू, त्यांना साष्टांग नमस्कार घालू
आधी या शब्दांची नावं जरा आपणही बदलून घेऊ

-कविता  महाजन
------------------------------------------------------------------------------------
चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातितल्या कणसाला मोतीयांचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळि अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरी हा रंग

देते कोण देते कोण देते कोण देते .......

सुर्या साठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्या साठी पाखराना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमाधे डन्ख
चिकट्ला कोळी त्याच्या पायाखाली डिंक

देते कोण देते कोण देते कोण देते .......


नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याचा प्रवासाचा नकाशा वाकडा
करवन्दाला चिक आणि आळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज

देते कोण देते कोण देते कोण देते .......


मूठभर बुल बुल हातभार तान
कोकिळेला गुरू नाही तरी गायी गान
काजव्याच्या पोटातून जळे लाल दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा

देते कोण देते कोण देते कोण देते .......


भिजे माती खाली तरी अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियातून लपे सारे शेत
नाजूकश्या गुलाबाच्या भोवतीला काटे
सरळश्या खोडावर पुढे दहा फाटे

देते कोण देते कोण देते कोण देते .......

- संदीप खरे.
------------------------------------------------------------------

प्रलय - संदीप खरे



उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?

मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही


अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग

अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत

पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत

अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर

अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर

स्पोँसर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदडभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल

सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट

थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून

काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने

आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही

Monday, 17 January 2011

सदा"फुली"....

का, कोणास ठाऊक... पण कधी-कधी मनाला खूप यातना होत रहातात... कसल्या.. कोणामुळे.. कशासाठी हे सारे माहित असतं.. पण सांगावेसे नाही वाटत. कधी माणसे तुटू नयेत म्हणून, कधी माणसे पुन्हा जोडाविशी वाटत नाहीत म्हणून... अन्‌ कधी-कधी आपली म्हटली जाणारी माणसंसुद्धा जर आपल्या यातना ओळखू शकत नसतील तर ... ! म्हणून....
पण यातना होत रहातात.. त्रास होत रहातो.. संवेदनशील मन जपल्याचा, जाणिवा जोपासल्याचा पश्चात्ताप होतो...
आपण निरुपाय होत असल्याची जाणीव मनाला पोखरते...

पण, कदाचित त्याहीपेक्षा आपण आपल्याच माणसांना नकोसे झालो आहोत... किंवा निदान त्यांना आता आपल्याबद्दल पूर्वी सारखी ओढ राहिलेली नाही हे पचविणे वेदनादायी असते... मनाची ही "समोरच्याचे मन ओळखण्याची क्षमता नसती तर बरं" असे वाटू लागते... आपले म्हणजे नेमके काय .. नेमके कोणाला म्हणावे.. त्याची व्याप्ती कोठपर्यंत.. त्यांच्याशी कसे वागावे.. कसे बोलावे... आणि आपल्या माणसांसमोरही निरागसपणे वागण्याचे "स्वातंत्र्य" वापरावे किंवा नाही अशा असंख्य प्रश्नांनी मन पोखरले जाते.. त्रास होतो.. उमेद मरते.. पण, आयुष्य थांबत नाही.. संपत नाही.. किंबहुना मनासारखे ते अडखळतही नाही... म्हणजे आपले आयुष्यही "आपले" असल्यासारखे वागत नाही.. या साऱ्या चक्राचा चालक कोण ? नियती.. परमेश्वर.. आत्मन्‌.. काहीच कळत नाही...
पण, अगदी जीव उडतो सगळ्यांवरून... या विश्वात कोणी कोणाचं नसतं, या विधानातील सत्यता पटते आणि त्याचवेळी प्रेम,प्रेमातून येणारा अधिकार, त्यातून येणारी सहजता,निर्माण होणाऱ्या अपेक्षा-भावनांच्या अभिव्यक्तींचे स्वातंत्र्य, नैसर्गिकता , फुलणारे व्यक्तिमत्व अशा आपल्या श्रद्धांना वैफल्याचे ग्रहण लागते..

कित्येकदा अत्यंत जवळच्या माणसांकडून वापरले जाणारे शब्द टोकाचे बोचरे असतात.. त्यातील अर्थ आणि त्यामागची भूमिका यांपेक्षा त्यातील टोमणा अधिक जहाल असतो.. अगदी आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाबद्दल आणि आपल्या भुमिकांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा तो टोमणा नाही पचत.. नाहीच पचत.. आणि का पचवावा याचे कारणही दृष्टीपथास येत नाही.. अंतःकरणाची आग मात्र होत राहाते.. जखम भळभळत रहाते... कधी न भरून येणारी.. अश्वत्थाम्यासारखी...!

आणि मानवी मन तरी किती हळवे असते नाही..! संवाद झाला तर असे वेदनदायी शब्द ऐकून व्याकूळ होते.. संवाद थांबवला तर संवाद होत नाही म्हणून व्याकूळ होते.. सहनशील अंतःकरणाने सारे पचवायचे म्हटले तर एकाग्रता-बौद्धिक क्षमता-सर्जनशीलता-गुणात्मकता अशा बाबींवर नकारात्मक परिणाम होत रहातो...
खरंच, त्या वेद आणि उपनिषदकर्त्यांची शाबास म्हटली पाहिजे... कोणातही अगदी पालकांपासून-प्रेयसी/पत्नी/मुले अशा कोणातही मन न गुंतवणे यातच यशस्वी जीवनाचे रहस्य सांगितले आहे त्यांनी ! त्यासाठी मनोनिग्रह आणि दृढ निश्चय ही साधने त्यांनी सुचविली आहेत..
खरंच, आपण कोणालाही नको आहोत, ही भावना किती भयंकर असेल नाही.. ! 
खरे तर असे नसते.. आपण कोणालाही नको असतो असे होत नाही.. असं म्हणतात की "या विश्वाच्या पसाऱ्यात आपण एक लहानशी व्यक्ती असतो हे खरे आहे... पण अशाच एखाद्या व्यक्तीचे उभे विश्व आपल्यात सामावलेले असू शकते..." म्हणजेच आपलेही विश्व अशाच एखाद्या [ अथवा काही..] व्यक्तीच्यात सामावलेले असू शकते.. आणि अशांपैकी एखाद्या व्यक्तीला आपण नकोसे झालो आहोत हे आपल्याला जाणवते तेव्हा आपल्याला जणू असे वाटते की आपण कोणालाही नकोसे झालो आहोत...
गंमत म्हणजे त्या व्यक्तीला आपण नकोसे झालो आहोत हे आपल्याला कसे जाणवते... तर आपल्या त्या व्यक्तीकडून असणाऱ्या प्रतिसादाच्या अपेक्षेला साजेसा प्रतिसाद आपल्याला मिळाला नाही की... म्हणजे.. याचे ही मूळ आपल्या अपेक्षेतच आहे तर ! म्हणजे आता आपल्या माणसांकडूनही कोणत्याही अपेक्षा न बाळगणे गरजेचे.. अधिकार-नैसर्गिकता-प्रांजळ अभिव्यक्ती या साऱ्यांवर "फ़ुली"  [सदा"फुली"....]  यातच जीवनाचा आनंद आहे..!
हे समजले... पण जमेल ? Can I... ? Can WE ..?

Thursday, 16 December 2010

हे चक्र भेदता येईल काय ?

कायद्याचे पालन करणारा पापभिरू सामान्य नागरिक... कुटुंबाची परवड करूनही शक्यतो कायदेभंग न करू शकणारी ही मंडळी... समोर कायद्याचे नियमित उल्लंघन करणाऱ्यांनी उभी केलेली आव्हाने... क्लिष्ट आणि गुंतागुंतीची विधीप्रक्रिया... न्यायमंडळे आणि कायद्याच्या संरक्षकांकडून संरक्षण मिळायची शक्यता जवळ-जवळ शून्य... आदर्शवादी तत्वे... आणि ही आव्हाने कायद्याच्या चौकटीतूनच सोडवायचा पर्याय..... याची परिणती म्हणजे सातत्याने येणारी निराशा आणि हतबलता....

       दैनंदिन जीवनात, प्रवासात, मनमोकळ्या गप्पा मारताना समाजात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत आली... आपण सगळेच अन्यायाच्या एक दुष्टचक्रात अडकलो आहोत. हे चक्र अभेद्य आहे का ? निश्चितच नाही. मग या चक्रामधून मुक्त होणाऱ्यांपेक्षा, या चक्रामध्ये अडकणाऱ्यांची संख्या अधिक का असावी ? या प्रश्नाने माझा बराच पिच्छा पुरवला होता, आजही यावर मला फार काही अधिकाराने बोलता येईल अशातला भाग नाही. पण कुठेतरी या चक्राच्या अभेद्यतेमागील एक कारण मला जाणवले.... Actually, the reason behind this is, we are fighting with ill-legal elements "legally"... आपण बेकायदेशीर समाजघटकांशी आणि अडचणींशी कायद्याच्या चौकटींतून लढायचा प्रयत्न करतो आहोत...


     मूळात कायदा हा संपूर्ण मानवी वर्तन नियंत्रित करूच शकत नाही. कारण परिस्थिती सापेक्ष मानवी प्रतिसाद हे बदलते असतात, परिवर्तनशील असतात. अशा संभाव्य प्रतिसादांची शक्यता लक्षात घेऊन सार्वकालिक आणि शाश्वत कायदे तयार करणे हे जवळ-जवळ अशक्य आहे. मग, अशा कायद्याच्या मदतीने बेकायदेशीर घटकांचा पराभव करणे हे कसे शक्य होईल ?


      त्यात आजही सामान्य माणसे लढताना दिसत नाहीत अशी तक्रार असते... माझीही ही तक्रार आहे.. आता हेच पहाना...

      शीतपेयांच्या बाटल्या विकत घ्यायच्या झाल्या द्या १-२ रुपये अधिक... बसचे तिकीट काढायचे झाले, वाहकाजवळ सुट्टे नाहीत, घालवा काही रुपये.. रेल्वे वाहतूकीचा पर्याय स्विकारावा तर प्रत्येक गाडी किमान १५-२० मिनीटे उशीराने धावते.. घरचा दूरध्वनी संच महिना-महिना बंद असतो पण बिलातील स्थिर मासिक आकार मात्र भरावाच लागतो.. पेट्रोलचे भाव एका वर्षात १६ रुपयांनी वाढतात आणि तेही जागतिक बाजारपेठेत या उत्पादनांचे भाव तौलनिक दृष्ट्या तसे स्थिर असताना.. मोबाईल कंपन्यांच्या "कस्टमर केयर"ला कॉल केला असता आपण कित्येक मिनीटे "प्रतिक्षेत" असतो, परिणामी आपले बिल हकनाक वाढते.. कुरियर कंपन्यांच्या पावत्यांवर "आतील वस्तू गहाळ झाल्यास आम्ही जबाबदार नाही" असे लिहिलेले असते आणि त्यावर आपल्याला सही करावी लागते.. आपण ती मुकाट्याने करतोही... पण आपण भांडतो का ? आपण पेटून उठतो का ? [माझी एक फॅंटॅसी आहे की सहज एखादवेळी हे ग्राहकाने म्हणावे.. की या बिलातील रक्कम देताना रुपयाच्या नोटा खोट्या आल्यास आम्ही जबाबदार रहाणार नाही... चालेल का ?]


     दैनंदिन जीवनात आपल्या विरोधात असंख्य घटना घडतात.. आपल्यावर प्रचंड अन्याय होतो.. आपण कायद्याच्या चौकटी पाळत असतो मात्र तरिही कायद्याची आपल्यालाच भिती वाटत रहाते.. खिशात योग्य किंमतीचे तिकीट असतानाही समोर तिकिट तपासनीस आला की आपल्या उरातील धडधड वाढते. आणि आश्चर्य म्हणजे आपल्याला या साऱ्याचा त्रास होत नाही.. चिडचिड होत नाही.. हीच माझी अस्वस्थता आहे... की का ? आपण का चिडत नाही ? आपण का बंड करत नाही ? आपण का लढत नाही ? आपण अधिकाधिक निष्क्रिय होतो, हतबल होतो... पण आपण संतापत नाही.. आणि यात मी ही आलोच... मला याची लाज वाटते..


     पण लाज वाटल्याने परिस्थिती बदलत नाही. हे असे का होत असावे याचाही विचार झालाच पाहिजे. मला जाणवते की बहुधा वाढते "बॅटल फिल्ड" हे याचे कारण असू शकेल... की अगदी घरातून बाहेर पाऊल टाकल्यापासून प्रत्येक श्वासासाठी लढावे लागणे आणि नैतिक दृष्ट्या योग्य वागूनही, कायदेशीररित्या बरोबर असूनही न्याय न मिळण्याचीच शाश्वती असणे यामुळे "पेटण्याऐवजी" सामान्य माणूस "विझत" असावा.. असे म्हटले तर मग आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते. कारण अशा वेळी आपण "बॅटलफील्ड" कमी करण्यासाठी काय करता येइल याचा विचार करायला हवा.

आपल्याला जमेल ? can we..?

Wednesday, 1 December 2010

अरुंधती, लिऊ झिओबो आणि ज्युलियन अ‍ॅसेंज.....

   बुकर पारितोषिक विजेती लेखिका, नोबेल शांतता पुरस्कार २०१० विजेता आणि विकीलिक्स्‌चा मालक..एकाच रेषेत ही नावे पहाताना आश्चर्य वाटले असेल ना... ?

पण या साऱ्यांमध्ये काही साम्यस्थळे आहेत... या तिघांनाही वेगवेगळ्या संदर्भात पण "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा" वापर केल्याबद्दल शिक्षेला अथवा शिक्षेच्या शक्यतेला सामोरे जावे लागत आहे... इतकेच नाही... तर हे सर्वच जण महासत्ता होण्याचे "potential" असणाऱ्या देशाने घटक आहेत.. आणि गंमत म्हणजे योगायोगाने तिघांनीही आपापल्या अभिव्यक्तींनी आपापल्या [ असेंज चा अपवाद ! ] राष्ट्राच्या प्रतिमेला निश्चितच तडा दिला आहे, शिवाय आपापल्या राष्ट्राच्या "परराष्ट्र संबंधांना" आव्हान दिले आहे... मात्र, चीन मधील "totaliterian" व्यवस्थेबद्दल आसूड ओढणारा आणि जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पडेल ती किंमत देऊन लढणारा लिऊ, "शासन हा जनताविरोधी कट असतो" या विचारांवर श्रद्धा असणारा ज्युलियन एकिकडे अन्‌ ऐतिहासिक सत्याचा स्वीकार न करणारी आणि शिवाय भारतीय शासनाच्या कार्यपद्धतीबद्दल अभ्यासशून्य शंका उपस्थित करणारी अरूंधती रॉय दुसरीकडे....   


पण आज हे सारे आठवायचे कारण.....
            विकीलिक्स्‌ने जाहीर केलेल्या "केबल गेट्स"मुळे अमेरिकेतील सरकारी गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेला आपल्या परराष्ट्र संबंधांची काळजी वाटू लागली आहे. काही सरकारी अधिकारीही "प्रत्येक देशाचे राजदूत/ मुत्सद्दी आणि परराष्ट्र सेवेतील अधिकारी गुप्तहेर म्हणून वावरतात" असे स्पष्टीकरण देवू लागले आहेत. अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरलही काल ".. अशी गोपनीय कागदपत्रे उघड करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केले जाईल, किंबहूना कायद्यात तरतूदी नसतील तर कायद्यात दुरुस्त्या करून शिक्षा केली जाईल.." असे म्हणाले... व्यक्ती स्वातंत्र्य- अभिव्यक्ती स्वातंत्र्य - पारदर्शकता आदी मूल्ये जगाला शिकवणाऱ्या या महासत्तेलाच आता स्वतःच्याच विचारधारेविरुद्ध लढावे लागणार आहे. मला व्यक्तीशः या वृत्ताचे आणखी काही पदर जाणवले...


१] गेली काही शतके आपल्या धोरणांनुसार जगाला नाचवणाऱ्या या देशाला इतके वर्षांत कधीही परराष्ट्र संबंधांची तमा बाळगावीशी वाटल्याचे पहाण्यात नाही.. उलट असलाच तर त्यांत एक उद्दामपणाच असायचा, की अन्य देशांनी आपले परराष्ट्र धोरण अमेरिकेच्या "हिडन हॅंड" मार्गदर्शनाद्वारे ठरवावे... आता ही परिस्थिती खरोखरच बदलली असेल का ? आणि असेलच तर कशाने ?


२] अमेरिका हा देश म्हणून वाचताना मला त्यांचे एक कौशल्य जाणवले. हा देश एक उत्तम "मार्केटींग" तंत्र जाणणारा देश आहे. कारण, सातत्याने या देशाने त्यांच्या समस्या याच जगाच्या समस्या असल्याचे प्रभावीपणे भासवले आहे. मग ती समस्या ग्लोबल वॉर्मिंगची असो, दहशतवादाची असो, आर्थिक महामंदीची असो, रोजगारजन्यतेची असो, चारित्र्याची असो, मानवी हक्कांची असो वा लहान मुलांच्या आरोग्याची असो... विशेष म्हणजे, या समस्येची कारण त्याच देशाची चुकलेली संकल्पना आणि धोरणे होती... पण अमेरिका मार्केटींग कंपनीने कारणे आणि उपायही जगासमोर अशा पद्धतीने मांडले की जणू जगाला "ते" "आपलेच" वाटावेत.. आणि म्हणूनच विकीलिक्स्‌ नंतरची या देशाची प्रतिक्रिया आता पहाणे महत्त्वाचे तसेच मनोरंजकही आहे.

३] स्वातंत्र्य हा अमेरिकेचा वैचारिक पाया आहे. या देशाचा विकास, त्यामागील भांडवलशाही धोरण स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांच्या भूमिका, दूरचित्रवाणी वरील दैंनंदिन मालिका- रिअ‍ॅलिटी शोज्‌ - बातम्या आदी सर्वच क्षेत्रांत आढळणारा समान घटक म्हणजे स्वातंत्र्य.. आणि याच मुद्द्यावर या देशाने आपले अस्तित्व टिकवले आहे. आता जेव्हा याच देशाच्या विविध धोरणांमागील भूमिका "Conspiracy as Governance" अशी विचारधारा असणाऱ्या ज्युलिअन अ‍ॅसेंज याने मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यावर व्यक्ती-अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य जपणाऱ्या या देशाकडून काय कारवाई होते आणि कोणत्या मुद्द्यांवर होते ते पहाणे उद्बोधक आहे. जगभरातील विविध देशांना मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचे धडे देणाऱ्या देशाकडून या विषयावर दिली जाणारी प्रतिक्रिया या दृष्टीने महत्त्वाची आहे.


४] १९८० पर्यंत तत्कालीन सोव्हियत रशिया हा सातत्याने विकासाच्या पायऱ्या चढत होता, असे निदान कागदावर तरी दिसत होते. प्रत्यक्षात मात्र "जॉर्जिया" मध्ये पोपनी केलेल्या विधानानंतर "floodgates were opened... & the rest is history...". तात्पर्य,  "सारे काही आलबेल आहे" असे सांगणाऱ्या देशात तसे खरेच असेल असे मानायचे कारण नाही. आजवर अमेरिका हा जागतिक दृष्टीकोनातून "जगण्याचा मानबिंदू" मानला जाणारा किंवा निदान मानबिंदू म्हणून ज्यांच्या कल्पना स्विकारल्या जातात असा देश होता. आता विकीलिक्स्‌, ग्राउंड झिरोवर मशीद उभारणे, रोजगार विषयक समस्या, आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर हा मानबिंदू बदलला जातो का किंवा निदान अशा वेळी अमेरिका आपली प्रतिमा कशी टिकवते, हे पहाणे गरजेचे आहे. शीतयुद्धास कारणीभूत असणाऱ्या दोन महासत्ता भिन्न मार्ग आणि वैचारिक बैठक असूनही जवळ-जवळ एकाच मार्गावर पोहोचल्याचे दिसत आहे...


५] याच पार्श्वभूमीवर चीन आणि भारत या संभाव्य महासत्तांकडे पहाणे गरजेचे आहे. कारण याही दोन्ही देशांची विचारधारा भिन्न आहे, दोन्ही देशात विद्यमान परिस्थितीबद्दल अस्वस्थता आहे, एक देश रशियाच्या कम्युनिस्ट विचारप्रणालीशी जुळणारा तर दुसरा "लोकशाही समाजवादी" म्हणजे तत्वतः कोणत्याच विचारधारेशी बांधिलकी नसणारा अथवा "तथाकथित" synthesis वादी... त्यामुळे इतिहासातील दोन महासत्तांच्या अस्तानंतर साधारण त्याच पायावर पुढील महासत्तांची वाटचाल काय असेल याचे आडाखे बांधता येणे गरजेचे आहे. किंबहून ज्या देशाला हे जमेल, आणि त्यानुसार संभाव्य धोके neutralise करता येतील तो निश्चितपणे जागतिक स्पर्धेत टिकाव धरेल आणि जिंकेलही... !


६] याच विषयाचा मला जाणवणारा आणि खरे म्हणजे वेदना देणारा घटक आहे तो बराक ओबामा यांच्या अस्तित्वाबद्दल.. ओबामा यांची भूमिका भारताच्या दृष्टीकोनाचा विचार करता "उपयुक्त" नसेलही, किंबहूना ती भारताच्या "हितसंबंधांना मारकही असू शकेल" ... [ It might be spoiling Indian National Interests.. ] पण, ओबामांचे निर्णय हे अमेरिकेचा विचार करता फार दूरदर्शी म्हणावे लागतील... { मला तुलनेचा मोह आवरत नाही.. ओबामा यांच्या सध्याच्या भूमिका मला थेट गोर्बाचेव्ह यांच्या "ग्लासनोस्त" आणि "पेरेस्त्रॉयका" यांसारख्या वाटतात.. राष्ट्राच्या मूळ विचारधारेशी थेट फारकत घेणाऱ्या..!} मात्र, जॉर्ज बुश यांची फसलेली धोरणे, ओबामा यांची मुस्लिम आणि कृष्णवर्णीय पार्श्वभूमी, संकटांचा सामना प्रतिसाद पद्धतीने [ reactively ] करण्याची अमेरिकेच्या नागरिकांना नसलेली सवय, इराक-अफगाण युद्धे, recession आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून ओबामा या आदर्शवादी माणसाकडून असलेल्या अपेक्षा यांचा फार मोठा फटका या "शांतता" पुरस्कार विजेत्याला बसल्यावाचून रहाणार नाही. आणि पुन्हा एकदा खरोखरीच देशाबद्दल प्रांजळ हितभावना असणाऱ्या माणसाला आपल्या पदाची किंमत मोजायला लागणार हे स्पष्ट आहे.. [ कधी-कधी तर हा मला रिपब्लिकांनी ’डेमोक्रॅट्स, विरुद्ध आखलेल्या नव्या "धोरणा"चाच भाग वाटतो..] पण "वॉटरगेट" प्रकरणाप्रमाणेच या "केबलगेट" प्रकरणाचा ओबामा यांच्या राजकिय कारकिर्दीवर होणारा परिणाम पहावा लागेल... आणि एक, जगातील लोकशाहीचा "कट्टर" पुरस्कर्ता मानला जाणाऱ्या देशात तळागाळातून वर येणाऱ्या- स्वच्छ आणि प्रामाणिक राजकारण्याचे भविष्य जर अंधःकारमय होणार असेल, त्याच्या राजकिय कारकिर्दीसमोर जर प्रश्नचिन्ह उभे रहाणार असेल तर अन्य देशात विशेषतः भारतात काय होईल याचा विचार करावा लागेल ?


७]  कार्ल मार्क्स हे थोर विचारवंत होते.. उभे जग भांडवलवादाच्या “तावडीत” असेल तेव्हाच हे तत्वज्ञान सर्वाधिक लागू होते किंवा तशी शक्यता निर्माण होते, असे त्यांनीच म्हणून ठेवले आहे.... मग या न्यायाने तर मार्क्सवादाचा सर्वात जास्त प्रभाव अत्ताच्या जगावर पडणे अपेक्षित आहे..  जागतिक धोरणांवर समाजवादाचा प्रभाव असणे ही गरज आहे..

... अशा वेळी "उदारीकरण-खासगीकरण आणि जागतिकीकरण" [ LPG ] याच मुद्यांना चालना देणे हे पचवता येणारे आहे का , याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. वाढता भांडवलवाद, कॉर्पोरेट जगत, जाहिराती, ग्राहक-विक्रेता नातेसंबंध असे सारे बदलते आयाम [dimension] मानवाला तारू शकतील का, हे तपासणे गरजेचे आहे... याचा विकीलिक्स्‌शी संबंध काय असा प्रश्न कदाचित आपल्या मनात येवू शकतो.. तर लक्षात घेऊया, शेवटी ही सुद्धा एक वेबसाईट आहे... [ संकेतस्थळ !!! ] याला सुद्धा व्यवसाय आहे.. येथेही "मागणी-पुरवठा" तंत्र आहे... या संकेतस्थळालाही ग्राहक आहेत.. त्यावर त्यांना मिळणाऱ्या जाहिराती अथवा पुरस्कर्त्यांचे प्रमाण अवलंबून आहे.. यातही स्पर्धा आहे.. धोके आहेत.. आधी कोण ही उत्कंठा आहे... म्हणजेच विकीलिक्स्‌ला सुद्धा ग्राहक-विक्रेते हा आयाम आहेच...! आणि म्हणूनच समाजवाद आणि भांडवलवाद यांच्यातील द्वंद्वाचा एक नवीन "Angle" या विषयामुळे जगासमोर येण्यास मदत होईलच....!


मला एक विनोद आठवतो....
निकिता क्रुश्चेव्ह सोव्हियत रशियाचे प्रमुख होते. ते स्वतःच हा किस्सा सांगत असत.
एकदा क्रेमलीनच्या राजवाड्यात एक माणूस जोरजोरात ओरडत शिरला : "क्रुश्चेव्ह मूर्ख आहे.. क्रुश्चेव्ह मूर्ख आहे.. "
त्या माणसाला ताब्यात घेण्यात आले.. त्याच्यावर खटला भरण्यात आला व त्याला तेवीस वर्षांची शिक्षा देण्यात आली. निकिता क्रुश्चेव्ह यांनी हा किस्सा सांगितला की, ऐकणारा स्वाभाविकच प्रश्न विचारत असे... तेवीस हा काय हिशोब ? ३-५-१०-२० असे शिक्षांसाठीचे आकडे ज्ञात आहेत, पण २३ ?
क्रुश्चेव्ह हसत उत्तर देत..." Yes 23... Three years for insulting a National Party Secretary.. & 20 years for revealing the Greatest Secret of USSR "...

बहुधा विकीलिक्स्‌च्या ज्युलियन अ‍ॅसेंजलाही शिक्षा झालीच तर ती.......!! 

Tuesday, 30 November 2010

काही प्रश्न...... अस्वस्थ करणारे...

दैनंदिन आयुष्य जगताना मला काही प्रश्न पडत रहातात.. त्यांची उत्तरे "पकड़ण्या एव्हढी" माझी चिमुकली मूठ बळकट  नाही... पण त्यांचा योग्य वेळीच परामर्श न घेतल्यास ते किती भीषण रूप धारण करू शकतात , याचे चित्र माझ्या मनावर मी चितारु शकतो... तेच हे प्रश्न....!!! 
१] विविध पाश्चिमात्य देश आणि आपण यांच्यात काही ठळक साम्यस्थळे आहेत का ?
२] शिक्षण आणि शेती ही भारतातील किंवा कदाचित जगातील सर्वात “ग्लॅमरहीन” क्षेत्रे आहेत.. पण मानवी आयुष्याचा विचार करता ही खूप प्राथमिक स्वरुपाची.. पायाभरणी करणारी क्षेत्रे आहेत.. मग या fields चे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय- काय करावे लागेल.. ?
३] महात्मा गांधी यांच्या भूमिका पहाताना मला एक गोष्ट जाणवली.. ती म्हणजे गांधीजींनी समूह / संघ / सहकार यांची भारतीय जनमानसावर सक्ती केली नाही.. उलट त्यांनी निवडीचे स्वातंत्र्य जनतेला बहाल केले.. खऱ्या अर्थाने त्यांची आंदोलने ही लोकशाहीची प्रतिमा म्हणावीत अशी ठरली.. कदाचित भारतीय मानसिकतेमध्ये संघभावनेला अथवा समूहाने एकत्र काम करण्याला अल्प स्थान आहे अस म्हणता येवू शकेल का ? विशेषतः वयक्तिक सत्याग्रहाच्या संदर्भात... आणि नंतरही भारतात कामगार चळवळींच्या एकूणच यशपयशसंदर्भात....
४] history repeats itself with minor changes , अस म्हणतात.. पण मग भारताच्या वर्तमानातील अनेक प्रश्नांवर आपण अन्य देशांकडे पहाण्यापेक्षा आपल्याच इतिहासात उत्तरे शोधू शकतो का ? कशी ? इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?  आणि जर हे शक्य असेल तर आजवर तसे प्रयत्न झाले आहेत का ? कुठे ? झाले नसल्यास कोणत्या अडचणींमुळे हे होवू शकले नाही?
५] पाश्चिमात्यांचे अंधानुकरण आणि त्यांच्या संकल्पनांचा डोळस स्वीकार यातील फरक कसा ओळखावा ? आणि मग अंधानुकरण कसे थोपवावे ?
६] दूर्दैवाने एकूणच शिक्षण पद्धतीत योगी अरविंद यांच्या एकूणच कार्याचे वर्णन अभावानेच आढळते.. क्रांतीकारक ते अध्यात्म हा त्यांचा प्रवास.. किंवा या संकल्पनांमध्ये त्यांनी पाहिलेले अद्वैत....  त्याबद्दल काही सांगाल का ?
७] एका लेखात आणि एक व्याख्यानात मी असे वाचले की, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे या भारतीय क्रांतीकारकाने , स्वतंत्र भारतात प्रवेश नाकारल्याने, मॅक्सिको येथे जावून तेथे महर्षी पराशर यांच्या कृषी विषयक ग्रंथांच्या मदतीने शेतीमध्ये क्रांती घडवून आणली. किंबहूना, आजही त्या देशात पराशर ॠषींच्या ग्रंथाचा शेतीविषयक अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे... मग भारताच्या शेतीविषयक अभ्यासक्रमामध्ये असा समावेश का होत नसावा..?
८] कार्ल मार्क्स हे थोर विचारवंत होते.. उभे जग भांडवलवादाच्या “तावडीत” असेल तेव्हाच हे तत्वज्ञान सर्वाधिक लागू होते किंवा तशी शक्यता निर्माण होते... मग या न्यायाने तर मार्क्सवादाचा सर्वात जास्त प्रभाव अत्ताच्या जगावर पडणे अपेक्षित आहे..  जागतिक धोरणांवर समाजवादाचा प्रभाव असणे ही गरज आहे.. अशावेळी काळाने दिलेली ही सुवर्णसंधी ओळखण्यात भारतातील समाजवादी चळवळ यशस्वी होते आहे का..? नसल्यास का नाही ? की कुठेतरी ही या चळवळीच्या मनात आलेली “हतबलता” reflect करते आहे..?  I mean what according to you is the relevance of these ideologies in current context..?
९] काश्मीर आणि जेरुसलेम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानता  येवू शकतील का ?
१०] हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर यांसारख्या विचारवंतांनी केलेले इस्लामचे परिक्षण आणि सध्या जहाल हिंदुत्ववादी विचारवंतांनी केलेले समीक्षण यात साम्य आढळते.. तेव्हा खरोखरच इस्लाम मधील वहाबी पंथ हा जगासमोर धोका आहे हे सत्य मानणे भारतात का शक्य नाही ? किती वर्षे आपण सत्यापासून पळ काढणार ?
११] भारतातील हिंदू मुस्लिम प्रश्न आपल्याला reframe करता येणे शक्य आहे का ? म्हणजे हा प्रश्न हिंदू मुस्लिम संबंध नसून , मुस्लिमांबद्दल हिंदूंचा दृष्टीकोन कसा असावा  याबद्दल हिंदूंमध्येच असलेले मतभेद आहे , अस म्हणता येईल का ?  आणि त्यातून यावर उपाय शोधता येतील का ?
१२] आजही भारतात दुर्दैवाने राष्ट्रनिष्ठ म्हणवली जाणारी मंडळी समाजवाद / सर्वसमावेशकता यांपेक्षा संपूर्ण त्यागशीलतेकडे पहातात. तर समाजवादी म्हणविली जाणारी मंडळी राष्ट्रवाद / धर्म / संस्कृती असे शब्द अस्पृश्य मानतात. या द्वैत भावनेचा भारताच्या लोकशाहीच्या यशस्वीतेवर नकारात्मक परिणाम होत असेल का ? यावर काही उपाय ?

१३] ग्रामीण भारताच्या विकासाची आवश्यकता आहे असे आपण म्हणतो. प्रत्येक गावाचे असे एक वेगळेपण असते. त्या गावाची स्वतंत्र संस्कृती असते. अशा वेळी जगाने मानबिंदू ठरवलेली सुत्रे त्या गावावर विकास म्हणून लादण्यापेक्षा आपल्याला कुठेतरी "गावाच्या शक्तीस्थानांवर" त्या गावाला उभे करता येईल का ? म्हणजे मार्केटिंग, निसर्ग , दळण-वळण , माहिती तंत्रज्ञान या सगळ्या आघाड्यांवर proactively रचना करता येईल का? तसेच , ग्राम विकासाइतकीच "शहरी प्रतिगामित्वाची" गरज आहे असे म्हणता येईल का ?.....

मला हे प्रश्न का पडतात नाही माहीत, पण मला यांची उत्तरे शोधता येतील ?

Saturday, 27 November 2010

a true HUMAN character....

आयुष्यात येणारे अनुभव हे कित्येकदा उन्मळून टाकणारे असतात... वारंवार होणारे अन्याय, अधिकारपदावरील व्यक्तींकडून न्याय मिळण्याच्या मावळत्या शक्यता, सातत्याने होणारे पराभव, गाडाव्याशा वाटणाऱ्या इच्छा, अगदी जीवनावरूनच उडालेले मन या साऱ्यानंतरही आयुष्य सुरुच राहतं... अंधाराच्या साम्राज्यानंतर, प्रकाशाची कोणतीही आशा उरलेली नसताना ज्याप्रमाणे सूर्यबिंबाच्या ज्वाळा अंतरी उमटतात... तद्वतच मानवी अंतःकरणातही लढाऊ बाणा चेतवणाऱ्या ज्वाळा उमटत अस्तील का... ?
          
                                                       अंतरातील ज्वाळा.....

कोठून येती आव्हाने, कोठून येती अन्यायमाला
न उमजे, तरी अंतरी राहती उभ्या कोठून धगधगत्या ज्वाला... ?

शुक्लपक्षी आशा कलेकलेने वृद्धिंगत होई
कृष्णपक्षी निराशेचे सावट नभ झाकोळून जाई
ना चांदण्या, ना चंद्र नभी असा उद्दाम क्षणही आला
नुमजे तरी अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


प्रणयाच्या धुंदीतून पहाटे बाहेर पडता रात्र
सावळ्या नभी उमटते गुलाबी लकेर अंशमात्र
जन्मास येई अनुदिनी तेजस्वी बालक कोवळा
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


स्वप्न पडते निद्रेस जेव्हा मंगल पहाटेचे
निसर्ग नयनी ओघळती ठिपके दवबिंदूंचे
अंधाराच्या रस्त्यावर रवीरथ प्रकाश फेकीत आला..
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


अन्यायाने पिचतो देह, पराभवाने कोमेजते तन
हतबल होते, निराश होते उत्साही-सृजनशील मन
तरिही पेटून उठतो देह.. अन्‌ चेतवितो बंडखोर वृत्तीला
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला.... ?

Friday, 26 November 2010

the 26/11 ....

आज २६ नोव्हेंबर...
आज ताज जवळ हजारो "गर्व गीते" , गर्भगळित होणाऱ्यांकडून गायली जातील.. बॅनरबाजी होईल.. "शांततायात्रा" आयोजित केल्या जातील... भारतातील आणि मुंबईतील "मेणबत्ती" उद्योगाला तेजी येईल...  शासकीय नेते दहशतवादविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसतील... सरकार दहशतवाद्याना "ठेचून" काढण्यास कसे समर्थ आहे हे वारंवार सांगितले जाईल....

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, असे म्हणणाऱ्या चापेकर बंधूंना टिळकांनीच विचारले होते... "अरे तुम्ही असे म्हणता खरे, पण मग तो रॅंड अजून जिवंत कसा ?".. आज लोकमान्य टिळक हवे होते... त्यांनी आवर्जून विचारले असते... "अरे एव्हढ्या बाता मारता, तर तो कसाब अजून जिवंत कसा ?...."

या देशाला नेमके काय झाले आहे तेच कळत नाही... देशालाच कशाला, तुम्हा-आम्हाला किंबहूना मला काय झाले आहे तेच नाही कळत....

या देशात इतका मोठा नरसंहार अवघ्या दोन दिवसात होतो आणि या घटनेला दोन वर्षही उलटत नाहित तोच केंद्रिय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याची राज्य दक्षता आयोगापुढे चौकशी सुरु असल्याचे लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालय या नियुक्तीवर आक्षेप नोंदविते.... आपण शांतच असतो...

या घटनेवेळी राज्याचे गृहमंत्री असणारे आमदार त्यानंतरच्या काळात झालेले गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांचे हल्ले पचवूनही पुन्हा एकदा तेच पद ग्रहण करतात.. कसाबला कोठडीत जाऊन भेटतात... आणि त्याच देशात- त्याच राज्यात तुरूंगातून सुटलेल्या संजय दत्तशी हस्तांदोलन केल्याबद्दल एका हवालदाराला निलंबित करण्यात येते...
आपण शांतच असतो...

कशेळीसारख्या एक खेड्यात एका दुपारी अचानक एक बोट येते... तिच्या हालचाली संशयास्पद वाटतात.. समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित तरूण सावधपणे पोलिसांना बोलावतात.. आणि कोणत्याही चौकशी शिवाय बोट सोडून दिली जाते... कसाब आणि मंडळी अशाच बोटीतून येवून काही दिवस पोलिसांसह मुंबईकराना वेठिस धरतात याचा पोलिसांना इतका सहज विसर पडतो..
आपण शांत असतो...

२६/११ रोजी कसाब आणि त्याच्या साथीदारांना बधवार पार्कमध्ये रात्री ८:४० वाजता स्थानिक मच्छिमार बांधवांकडून हटकले जाते... मात्र मुंबईतील पहिला गोळीबार रात्री ९:३७ वाजता होतो... म्हणजे जवळ-जवळ एक तास अतिरेकी मुंबईमध्ये मोकाट फिरत असतात.. तरीही अतिरेक्यांच्या स्थानिक "काँटॅक्ट्ची" शक्यता पोलिसांकडून ठामपणे फेटाळली जाते... आणि गंमत म्हणजे बधवार पार्क पासून सीएस्‌टी स्थानक वगळता अन्य सर्व हल्ल्याची ठिकाणे ही चालत १० मिनीटांच्या अंतरावर असतात.. आपल्याला हे सारे उघड्या डोळ्यांनी दिसत असते,पण ...
आपण शांतच असतो...

या हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे ओरडून-ओरडून काही प्रश्न विचारतात.. पुस्तक रूपाने मांडतात.. कामटे यांना मुंबई पोलिसांची न मिळू शकलेली मदत, शहीद करकरे यांचे गायब झालेले "तथाकथित" बुलेटप्रूफ जॅकेट... ओंबाळे कुटुंबियांना न मिळालेली मदत... या साऱ्या गोष्टींनी आपण आतून हलून जातो.. पण...
आपण शांतच असतो...

२६/११ च्या घटनेचे ताशेरे आणि त्या अपयशाचे खापर सहजरित्या आपल्या गुप्तचर यंत्रणांवर फोडले जाते.. आपण मारे सतर्कतेच्या आणि दक्षतेच्या गप्पा मारायच्या.. आणि शेजारच्या माणसाशी साधे बोलायचे कष्ट आपण रेल्वेमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्ब्यात घ्यायचे नाहीत... ही आपल्याच आजूबाजूला दिसणारी "सतर्कता" आपण टिपत असतो... पण..
आपण शांत असतो...

मला एक कविता आठवते....

".....then they came for me"
---------------------------------------
 first they came for the jews
 and i did nothing, because i am not a jew
 then they came for the communists
 and i did nothing because i am not communist
then they came for trade unionists
  and i said nothing because i am not a trade unionist
  and then they came for me
  and there was no one left to speak for me.....

आपली शांतता मला या दिशेने जाणारी वाटते...!
शहीदांना श्रद्धांजली म्हणून आरती गाण्यापेक्षा, मेणबत्त्या लावण्यापेक्षा, सरकारला दोष देण्यापेक्षा आपण काही वेगळे करूच शकत नाही का ? रस्त्यावरून जाताना न थुंकणे, कचरा रस्त्यावर न टाकणे, किमान आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींचे निरिक्षण करणे, सैनिकांच्या जीवनाकडे केवळ "ईश्वरी" म्हणून न पाहता ती जीवनमुल्ये अंगी बाणवणे, किमान वाहतुकीचे नियम पाळणे आणि रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेणे....... आपण इतक्या साध्या गोष्टीही करू शकत नाही का ? परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून बोंबलण्यापेक्षा ती चिघळणार नाही याची साधी काळजी घेणे सोपे नाही का ? पण...
आपण शांतच असतो....

कोणे एके काळी, स्वातंत्र लढ्यात मोहनदास गांधीजी असे म्हणाले होते..
की, एकाच वेळी उभा भारत देश एकाच वेळी थुकला जरी, तरी हे गोरे त्यात वाहून जातील...
आपण इतर वेळी रस्त्यांवर पचापचा थुकतो... पण एकाच वेळी थुकायला जमेल.... ?
can we....????