Tuesday, 30 November 2010

काही प्रश्न...... अस्वस्थ करणारे...

दैनंदिन आयुष्य जगताना मला काही प्रश्न पडत रहातात.. त्यांची उत्तरे "पकड़ण्या एव्हढी" माझी चिमुकली मूठ बळकट  नाही... पण त्यांचा योग्य वेळीच परामर्श न घेतल्यास ते किती भीषण रूप धारण करू शकतात , याचे चित्र माझ्या मनावर मी चितारु शकतो... तेच हे प्रश्न....!!! 
१] विविध पाश्चिमात्य देश आणि आपण यांच्यात काही ठळक साम्यस्थळे आहेत का ?
२] शिक्षण आणि शेती ही भारतातील किंवा कदाचित जगातील सर्वात “ग्लॅमरहीन” क्षेत्रे आहेत.. पण मानवी आयुष्याचा विचार करता ही खूप प्राथमिक स्वरुपाची.. पायाभरणी करणारी क्षेत्रे आहेत.. मग या fields चे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय- काय करावे लागेल.. ?
३] महात्मा गांधी यांच्या भूमिका पहाताना मला एक गोष्ट जाणवली.. ती म्हणजे गांधीजींनी समूह / संघ / सहकार यांची भारतीय जनमानसावर सक्ती केली नाही.. उलट त्यांनी निवडीचे स्वातंत्र्य जनतेला बहाल केले.. खऱ्या अर्थाने त्यांची आंदोलने ही लोकशाहीची प्रतिमा म्हणावीत अशी ठरली.. कदाचित भारतीय मानसिकतेमध्ये संघभावनेला अथवा समूहाने एकत्र काम करण्याला अल्प स्थान आहे अस म्हणता येवू शकेल का ? विशेषतः वयक्तिक सत्याग्रहाच्या संदर्भात... आणि नंतरही भारतात कामगार चळवळींच्या एकूणच यशपयशसंदर्भात....
४] history repeats itself with minor changes , अस म्हणतात.. पण मग भारताच्या वर्तमानातील अनेक प्रश्नांवर आपण अन्य देशांकडे पहाण्यापेक्षा आपल्याच इतिहासात उत्तरे शोधू शकतो का ? कशी ? इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?  आणि जर हे शक्य असेल तर आजवर तसे प्रयत्न झाले आहेत का ? कुठे ? झाले नसल्यास कोणत्या अडचणींमुळे हे होवू शकले नाही?
५] पाश्चिमात्यांचे अंधानुकरण आणि त्यांच्या संकल्पनांचा डोळस स्वीकार यातील फरक कसा ओळखावा ? आणि मग अंधानुकरण कसे थोपवावे ?
६] दूर्दैवाने एकूणच शिक्षण पद्धतीत योगी अरविंद यांच्या एकूणच कार्याचे वर्णन अभावानेच आढळते.. क्रांतीकारक ते अध्यात्म हा त्यांचा प्रवास.. किंवा या संकल्पनांमध्ये त्यांनी पाहिलेले अद्वैत....  त्याबद्दल काही सांगाल का ?
७] एका लेखात आणि एक व्याख्यानात मी असे वाचले की, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे या भारतीय क्रांतीकारकाने , स्वतंत्र भारतात प्रवेश नाकारल्याने, मॅक्सिको येथे जावून तेथे महर्षी पराशर यांच्या कृषी विषयक ग्रंथांच्या मदतीने शेतीमध्ये क्रांती घडवून आणली. किंबहूना, आजही त्या देशात पराशर ॠषींच्या ग्रंथाचा शेतीविषयक अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे... मग भारताच्या शेतीविषयक अभ्यासक्रमामध्ये असा समावेश का होत नसावा..?
८] कार्ल मार्क्स हे थोर विचारवंत होते.. उभे जग भांडवलवादाच्या “तावडीत” असेल तेव्हाच हे तत्वज्ञान सर्वाधिक लागू होते किंवा तशी शक्यता निर्माण होते... मग या न्यायाने तर मार्क्सवादाचा सर्वात जास्त प्रभाव अत्ताच्या जगावर पडणे अपेक्षित आहे..  जागतिक धोरणांवर समाजवादाचा प्रभाव असणे ही गरज आहे.. अशावेळी काळाने दिलेली ही सुवर्णसंधी ओळखण्यात भारतातील समाजवादी चळवळ यशस्वी होते आहे का..? नसल्यास का नाही ? की कुठेतरी ही या चळवळीच्या मनात आलेली “हतबलता” reflect करते आहे..?  I mean what according to you is the relevance of these ideologies in current context..?
९] काश्मीर आणि जेरुसलेम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानता  येवू शकतील का ?
१०] हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर यांसारख्या विचारवंतांनी केलेले इस्लामचे परिक्षण आणि सध्या जहाल हिंदुत्ववादी विचारवंतांनी केलेले समीक्षण यात साम्य आढळते.. तेव्हा खरोखरच इस्लाम मधील वहाबी पंथ हा जगासमोर धोका आहे हे सत्य मानणे भारतात का शक्य नाही ? किती वर्षे आपण सत्यापासून पळ काढणार ?
११] भारतातील हिंदू मुस्लिम प्रश्न आपल्याला reframe करता येणे शक्य आहे का ? म्हणजे हा प्रश्न हिंदू मुस्लिम संबंध नसून , मुस्लिमांबद्दल हिंदूंचा दृष्टीकोन कसा असावा  याबद्दल हिंदूंमध्येच असलेले मतभेद आहे , अस म्हणता येईल का ?  आणि त्यातून यावर उपाय शोधता येतील का ?
१२] आजही भारतात दुर्दैवाने राष्ट्रनिष्ठ म्हणवली जाणारी मंडळी समाजवाद / सर्वसमावेशकता यांपेक्षा संपूर्ण त्यागशीलतेकडे पहातात. तर समाजवादी म्हणविली जाणारी मंडळी राष्ट्रवाद / धर्म / संस्कृती असे शब्द अस्पृश्य मानतात. या द्वैत भावनेचा भारताच्या लोकशाहीच्या यशस्वीतेवर नकारात्मक परिणाम होत असेल का ? यावर काही उपाय ?

१३] ग्रामीण भारताच्या विकासाची आवश्यकता आहे असे आपण म्हणतो. प्रत्येक गावाचे असे एक वेगळेपण असते. त्या गावाची स्वतंत्र संस्कृती असते. अशा वेळी जगाने मानबिंदू ठरवलेली सुत्रे त्या गावावर विकास म्हणून लादण्यापेक्षा आपल्याला कुठेतरी "गावाच्या शक्तीस्थानांवर" त्या गावाला उभे करता येईल का ? म्हणजे मार्केटिंग, निसर्ग , दळण-वळण , माहिती तंत्रज्ञान या सगळ्या आघाड्यांवर proactively रचना करता येईल का? तसेच , ग्राम विकासाइतकीच "शहरी प्रतिगामित्वाची" गरज आहे असे म्हणता येईल का ?.....

मला हे प्रश्न का पडतात नाही माहीत, पण मला यांची उत्तरे शोधता येतील ?

Saturday, 27 November 2010

a true HUMAN character....

आयुष्यात येणारे अनुभव हे कित्येकदा उन्मळून टाकणारे असतात... वारंवार होणारे अन्याय, अधिकारपदावरील व्यक्तींकडून न्याय मिळण्याच्या मावळत्या शक्यता, सातत्याने होणारे पराभव, गाडाव्याशा वाटणाऱ्या इच्छा, अगदी जीवनावरूनच उडालेले मन या साऱ्यानंतरही आयुष्य सुरुच राहतं... अंधाराच्या साम्राज्यानंतर, प्रकाशाची कोणतीही आशा उरलेली नसताना ज्याप्रमाणे सूर्यबिंबाच्या ज्वाळा अंतरी उमटतात... तद्वतच मानवी अंतःकरणातही लढाऊ बाणा चेतवणाऱ्या ज्वाळा उमटत अस्तील का... ?
          
                                                       अंतरातील ज्वाळा.....

कोठून येती आव्हाने, कोठून येती अन्यायमाला
न उमजे, तरी अंतरी राहती उभ्या कोठून धगधगत्या ज्वाला... ?

शुक्लपक्षी आशा कलेकलेने वृद्धिंगत होई
कृष्णपक्षी निराशेचे सावट नभ झाकोळून जाई
ना चांदण्या, ना चंद्र नभी असा उद्दाम क्षणही आला
नुमजे तरी अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


प्रणयाच्या धुंदीतून पहाटे बाहेर पडता रात्र
सावळ्या नभी उमटते गुलाबी लकेर अंशमात्र
जन्मास येई अनुदिनी तेजस्वी बालक कोवळा
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


स्वप्न पडते निद्रेस जेव्हा मंगल पहाटेचे
निसर्ग नयनी ओघळती ठिपके दवबिंदूंचे
अंधाराच्या रस्त्यावर रवीरथ प्रकाश फेकीत आला..
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


अन्यायाने पिचतो देह, पराभवाने कोमेजते तन
हतबल होते, निराश होते उत्साही-सृजनशील मन
तरिही पेटून उठतो देह.. अन्‌ चेतवितो बंडखोर वृत्तीला
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला.... ?

Friday, 26 November 2010

the 26/11 ....

आज २६ नोव्हेंबर...
आज ताज जवळ हजारो "गर्व गीते" , गर्भगळित होणाऱ्यांकडून गायली जातील.. बॅनरबाजी होईल.. "शांततायात्रा" आयोजित केल्या जातील... भारतातील आणि मुंबईतील "मेणबत्ती" उद्योगाला तेजी येईल...  शासकीय नेते दहशतवादविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसतील... सरकार दहशतवाद्याना "ठेचून" काढण्यास कसे समर्थ आहे हे वारंवार सांगितले जाईल....

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, असे म्हणणाऱ्या चापेकर बंधूंना टिळकांनीच विचारले होते... "अरे तुम्ही असे म्हणता खरे, पण मग तो रॅंड अजून जिवंत कसा ?".. आज लोकमान्य टिळक हवे होते... त्यांनी आवर्जून विचारले असते... "अरे एव्हढ्या बाता मारता, तर तो कसाब अजून जिवंत कसा ?...."

या देशाला नेमके काय झाले आहे तेच कळत नाही... देशालाच कशाला, तुम्हा-आम्हाला किंबहूना मला काय झाले आहे तेच नाही कळत....

या देशात इतका मोठा नरसंहार अवघ्या दोन दिवसात होतो आणि या घटनेला दोन वर्षही उलटत नाहित तोच केंद्रिय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याची राज्य दक्षता आयोगापुढे चौकशी सुरु असल्याचे लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालय या नियुक्तीवर आक्षेप नोंदविते.... आपण शांतच असतो...

या घटनेवेळी राज्याचे गृहमंत्री असणारे आमदार त्यानंतरच्या काळात झालेले गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांचे हल्ले पचवूनही पुन्हा एकदा तेच पद ग्रहण करतात.. कसाबला कोठडीत जाऊन भेटतात... आणि त्याच देशात- त्याच राज्यात तुरूंगातून सुटलेल्या संजय दत्तशी हस्तांदोलन केल्याबद्दल एका हवालदाराला निलंबित करण्यात येते...
आपण शांतच असतो...

कशेळीसारख्या एक खेड्यात एका दुपारी अचानक एक बोट येते... तिच्या हालचाली संशयास्पद वाटतात.. समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित तरूण सावधपणे पोलिसांना बोलावतात.. आणि कोणत्याही चौकशी शिवाय बोट सोडून दिली जाते... कसाब आणि मंडळी अशाच बोटीतून येवून काही दिवस पोलिसांसह मुंबईकराना वेठिस धरतात याचा पोलिसांना इतका सहज विसर पडतो..
आपण शांत असतो...

२६/११ रोजी कसाब आणि त्याच्या साथीदारांना बधवार पार्कमध्ये रात्री ८:४० वाजता स्थानिक मच्छिमार बांधवांकडून हटकले जाते... मात्र मुंबईतील पहिला गोळीबार रात्री ९:३७ वाजता होतो... म्हणजे जवळ-जवळ एक तास अतिरेकी मुंबईमध्ये मोकाट फिरत असतात.. तरीही अतिरेक्यांच्या स्थानिक "काँटॅक्ट्ची" शक्यता पोलिसांकडून ठामपणे फेटाळली जाते... आणि गंमत म्हणजे बधवार पार्क पासून सीएस्‌टी स्थानक वगळता अन्य सर्व हल्ल्याची ठिकाणे ही चालत १० मिनीटांच्या अंतरावर असतात.. आपल्याला हे सारे उघड्या डोळ्यांनी दिसत असते,पण ...
आपण शांतच असतो...

या हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे ओरडून-ओरडून काही प्रश्न विचारतात.. पुस्तक रूपाने मांडतात.. कामटे यांना मुंबई पोलिसांची न मिळू शकलेली मदत, शहीद करकरे यांचे गायब झालेले "तथाकथित" बुलेटप्रूफ जॅकेट... ओंबाळे कुटुंबियांना न मिळालेली मदत... या साऱ्या गोष्टींनी आपण आतून हलून जातो.. पण...
आपण शांतच असतो...

२६/११ च्या घटनेचे ताशेरे आणि त्या अपयशाचे खापर सहजरित्या आपल्या गुप्तचर यंत्रणांवर फोडले जाते.. आपण मारे सतर्कतेच्या आणि दक्षतेच्या गप्पा मारायच्या.. आणि शेजारच्या माणसाशी साधे बोलायचे कष्ट आपण रेल्वेमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्ब्यात घ्यायचे नाहीत... ही आपल्याच आजूबाजूला दिसणारी "सतर्कता" आपण टिपत असतो... पण..
आपण शांत असतो...

मला एक कविता आठवते....

".....then they came for me"
---------------------------------------
 first they came for the jews
 and i did nothing, because i am not a jew
 then they came for the communists
 and i did nothing because i am not communist
then they came for trade unionists
  and i said nothing because i am not a trade unionist
  and then they came for me
  and there was no one left to speak for me.....

आपली शांतता मला या दिशेने जाणारी वाटते...!
शहीदांना श्रद्धांजली म्हणून आरती गाण्यापेक्षा, मेणबत्त्या लावण्यापेक्षा, सरकारला दोष देण्यापेक्षा आपण काही वेगळे करूच शकत नाही का ? रस्त्यावरून जाताना न थुंकणे, कचरा रस्त्यावर न टाकणे, किमान आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींचे निरिक्षण करणे, सैनिकांच्या जीवनाकडे केवळ "ईश्वरी" म्हणून न पाहता ती जीवनमुल्ये अंगी बाणवणे, किमान वाहतुकीचे नियम पाळणे आणि रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेणे....... आपण इतक्या साध्या गोष्टीही करू शकत नाही का ? परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून बोंबलण्यापेक्षा ती चिघळणार नाही याची साधी काळजी घेणे सोपे नाही का ? पण...
आपण शांतच असतो....

कोणे एके काळी, स्वातंत्र लढ्यात मोहनदास गांधीजी असे म्हणाले होते..
की, एकाच वेळी उभा भारत देश एकाच वेळी थुकला जरी, तरी हे गोरे त्यात वाहून जातील...
आपण इतर वेळी रस्त्यांवर पचापचा थुकतो... पण एकाच वेळी थुकायला जमेल.... ?
can we....????

Thursday, 4 November 2010

गाऊ त्यांना आरती....!!

 ----------------------------------------------------------
 दिवाळीचा फराळ , फटाके, नातेवाईकांच्या भेटी, सुंदर रोषणाई यात आपण न्हाऊन निघतो... सकाळचे अभ्यंग स्नान, सुगंधी उठणे यांची मजा अनुभवतो... आयुष्याच्या असंख्य वेदनांवर दिवाळीच्या रूपात फुंकर घातल्याचा आपल्याला भास होतो.... कारण आपण सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगत असतो... ज्या काही मोजक्या पण समर्पित माणसांमुळे हे शक्य होत आले आहे, ती म्हणजे लष्कर आणि गुप्तचर संघटनांची माणसे... त्यांच्या योगदानाकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.....
--------------------------------------------------


चित्रगुप्तासमोर एक माणूस उभा असतो...
त्याने आयुष्यात केलेल्या पाप-पुण्याचा हिशोब आणि लेखापरिक्षण सुरू असते...
त्याला काही प्रश्न विचारले जातात....
"तू आजवर अनेक माणसांवर हल्ले केलेस हे सत्य आहे?"
"हो..." समोरून शांतपणे उत्तर येते...
"तुझ्या आयुष्यात तू  स्वतःच्या पत्नी आणि मुलांकडे लक्ष दिलेले नाहीस, हे सत्य आहे ?"
"हो.." पुन्हा एकदा ठाम उत्तर.
"तू स्वतःच्या विवेक बुद्धीला पटत नसतानाही अनेक आदेश पाळले आहेस , बरोबर ?"
"हं..... बरोबर ! " आवाजाच्या लयीत जराही बदल न होता उत्तर येते..
"ऐन गरजेच्या वेळी तू तुझ्या जन्मदात्यांकडे लक्ष पुरवू शकला नाहीस हे सत्य ना ?"
"हो.. दुःखद आहे पण हे सत्य आहे..!" तितक्याच प्रांजळपणे उत्तर येते....

"मग आता तुला स्वर्गाचे दरवाजे बंद आहेत...! अशी पापे केल्याबद्दल तुला नरकात जावे लागेल.....!", चित्रगुप्त फर्मावितो.... आणि विचारतो, यावर तुझा काही प्रतिवाद ?
हा माणूस मंद हसतो.... आणि म्हणतो प्रतिवाद काहिही नाही... फक्त एक सांगायचे राहिले.... "मी भारतीय लष्करातील जवान आहे.!!"
चित्रगुप्ताचा ऑडिट रिपोर्ट तिथल्या तिथे बदलला जातो....
पण या एका "ब्लॅक ह्युमर" मधून भारतीय जवानांचे जीवन स्पष्ट होते........


                     शाश्वततेने अशाश्वततेचा आणि आव्हानांचा सातत्याने पाठपुरावा करणारे... भारतीयांच्या संरक्षणासाठी अविरत झटणारे... ऊन-वारा-पाऊस-बर्फ...{ आपल्यासाठी तीनच ऋतू असतात... पण सैन्यासाठी मात्र बर्फ हा स्वतंत्र प्रकार असतो... भारतात सियाचीन सारख्या ठिकाणी सैन्य -४० डिग्री ला कार्यरत असते...!!!} यांच्या निरपेक्ष डोळ्यात तेल घालून सीमांकडे लक्ष देणारे आणि कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे सहजपणे आपल्या खांद्यावर वागविणारे आपले सैन्य.......

दिवाळीचा फराळ , फटाके, नातेवाईकांच्या भेटी, सुंदर रोषणाई यात आपण न्हाऊन निघतो... सकाळचे अभ्यंग स्नान, सुगंधी उटणे यांची मजा अनुभवतो... आयुष्याच्या असंख्य वेदनांवर दिवाळीच्या रूपात फुंकर घातल्याचा आपल्याला भास होतो.... कारण आपण सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगत असतो... ज्या काही मोजक्या पण समर्पित माणसांमुळे हे शक्य होत आले आहे, ती म्हणजे लष्कर आणि गुप्तचर संघटनांची माणसे...
कशी असेल त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी..?

"खूपदा आम्ही घरीच नसतो... किंवा असलो तरी डोळ्यासमोर सातत्याने सीमांवरील परिस्थिती असते !", कॅप्टन पाटणकर सांगत होते. "फराळ, फटाके यांचे विशेष काही वाटत नाही... आणि असेही एका कारगील सारख्या युद्धात आम्ही उभ्या आयुष्याचे फटाके पाहून घेतलेले असतात...पण.... " बोलता बोलता त्यांच्या नजरेत उरातील शल्य व्यक्त करणारा ओलावा येतो... "खऱ्या अर्थाने आम्ही भाऊबीजेसारखा सण मात्र मिस करतो...!" उभ्या देशाशी रक्षाबंधन खेळणारी ही माणसे स्वतःच्या हक्काच्या बहिणीला मात्र वेळ देवू शकत नाहीत... आणि दुसरीकडे आपण मात्र ताईने किंवा दादाने मला हवी ती भेटवस्तू दिली नाही म्हणून चिड-चिड करत असतो....

"आम्हाला काय, आमची मुले घरी येतील तोच दिवाळी आणि दसरा..." अशाच एका अनाम वीराची आई हळवी होवून सांगत असते.. प्रत्येक दिवाळीला फराळ केला तरी तो घशाखाली उतरत नाही... आठवण येत रहाते... कधी लाडक्या लेकाऐवजी त्याची मित्रमंडळी घरी येतात.... मग मात्र बरे वाटते... ते मित्रही आम्हाला आई आणि बाबा म्हणूनच हाक मारतात.... मोट्ठी पोकळी भरून निघाल्यासारखी वाटते.. आई बोलतच रहातात.. नकळ आपणही त्यांना आई-बाबा म्हणू लागलेलो असतो...
 
  नुकताच लष्करात लेफ्टनंट म्हणून जॉईन झालेल्या विक्रांत बापट यांच्या आई सांगत होत्या... यावेळी तर विक्रांत पुण्याला आहे... पण एव्हढ्या जवळ असूनही आमची भेट मात्र होईलच असे नाही... उलट यंदा विक्रांतच्या मित्रांनीच फर्माईश केली आहे.. करंज्या, लाडू अशा पदार्थांची... त्यांमुळे ते पाठवणार आहे... तेव्हढाच आनंद आणि समाधान ! आई भरभरून बोलत असतात.... आपण मंत्रमुग्ध झालेलो असतो... स्वतःच्या आयुष्यातील सुखांचे अर्थ आणि सखोलता शोधत..!

   एकीकडे , कुटुंबांची अशी भावना तर , दुसरीकडे अरूणाचल मधील केंगसुंग दामो ह्या एडीसीची कहाणी... "ऐन भारत-चीन युद्धाच्या धामधूमीतला जन्म.. तोही तावांग मधील... तेव्हाही दिवाळीच होती... पण त्यावेळी वेगळ्या फटाक्यांचा संस्कार झाला... आणि कायमचाच ! त्यातूनच आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येकाला संवाद साधण्याच्या आधी ’जय हिंद’ म्हणायची सवय लागली अन्‌ त्याच सहजतेने सरकारच्या अरूणाचलकडे होणाऱ्या दूर्लक्षाकडे पहाण्याचीही आदत बन गयी..!" दामो सांगत असतात... आज पन्नास वर्ष व्हायला आली तरी इशान्येकडे होणाऱ्या भारताच्या दूर्लक्षाची अखंड परंपरा आणि चीन संदर्भातील  धोरणांचे अंधत्व कायम आहे...

    एकिकडे समोर उभ्या असलेल्या पराक्रमाच्या आणि इच्छाशक्तीच्या जिवंत मूर्तीकडून आपल्याला इतिहासाचे ज्ञान होत असते.. आणि दुसरीकडे आपण इतिहासाची वर्तमानाशी सांगड घालत असतो... परिणाम ? समोरची मूर्ती कायमच हसरी आणि आपल्या नशिबी मात्र हतबलता !

काही "नशीबवान" घरात मात्र आपल्याला उत्साहाचे वातावरण दिसून येते.. तेथील नजराच सांगतात.. की ही आमची सर्वार्थाने दिवाळी आहे... आपणही नकळत आपली दिवाळी साजरी करू लागतो... त्या घरात एकाच वेळी, येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई केली जात असते.. कुटुंबाच्या सदस्यांना एकमेकांशी संवाद साधायचा असतो... अल्प उपलब्ध वेळात घरी आलेल्या "लाडक्यांचा" सहवास मुक्तपणे लुटायचा असतो.. आणि तरीही एक प्रकारची विलक्षण संयतता घरात आढळते.....

भगवद्गीतेचा दूसरा अध्याय आपण अनुभवत असतो....
भारताच्या सैन्याचा अजोड त्याग, त्यांचा पराक्रम, त्यामागे त्यांच्या कुटुंबीयांचे असलेले योगदान आपल्याला अस्वस्थ करून सोडते..
शत्रू नाशाची नरक चतुर्दशी, संरक्षणाचे लक्ष्मीपूजन आणि पराक्रमाचा पाडवा आपल्याला एका गीताच्या ओळी आठवून देतो...

"संगरी विराग्रणी जे धैर्यमेरू संकटी
जन्मले या भारती...
गाऊ त्यांना आरती... गाऊ त्यांना आरती...!!!"

Saturday, 30 October 2010

on "cloud" 9th....!!!

आकाशाच्या अथांग घुमटात असंख्य ढग मुक्तपणे संचार करत असतात.... आपण सगळेच या ढगांकडे काहीना काही मागत असतो... आपल्या भावना व्यक्त करत असतो... कालिदासाने तर या ढगाच्या मदतीने संदेशवहनही केले होते... पण त्या ढगालाही काही भावना असतीलच... त्या ढगालाच बोलता आले तर... तर ?... तो काय बोलेल... याचा विचार करताना, सहज उतरलेल्या या प्रांजळ भावना.....

                                                               मेघ गर्जना....!!!


होता मार्दव कंठही मजला...
गगनातील एकाकी मेघ हे वदला....


मम शब्दांनी पळती निष्पाप जीव हे..
मज सोडून जाती, प्राणसखे ही
मम "शब्द प्रकाश" होई असह्य तुजला..
गगनातील एकाकी मेघ हे वदला......


बरसण्याची वाट पहाती येथील हजारो डोळे
विणती माझ्याभोवती असंख्य अपेक्षांचे जाळे
काय वाटते तुला, न कोणी विचारे मजला..
गगनातील एकाकी मेघ हे वदला.....


शब्द बुडबुड्यात ज्ञान गवसत नाही
अन गर्जणारा कधीही बरसत नाही
या जाणिवेने मी शब्दही "गिळला"..
गगनातील एकाकी मेघ हे वदला.....


आकार- रचना ओबडधोबड, दवरूपात येते वेदना माझी
घुसमट माझी तुम्हा वाटते, स्वच्छ मोकळी सकाळ ताजी..
यातूनच स्वरवंचनेचा मार्ग मज स्फुरला...
गगनातील एकाकी मेघ हे वदला......


साठवितो मी विश्वस्पंदने, "ओलावा" अन कोवळी स्वप्ने
दुःखक्षणी मग बरसतो मी, अन टिकवितो मी तुमची मने
माझ्या अंतरातील पोकळी कधी कळेल का रे तुजला......
गगनातील एकाकी मेघ हे वदला....

Friday, 29 October 2010

"dear" Arundhatee Roy.....










what about their freedom ? what about their rights ? what about their voices ? what about the feelings of "their" mothers " what about their families ?...........
What about their silent cry..... ?

dear arundhatee baai...... never forget such "small things.."

Thursday, 28 October 2010

"dear" Arundhatee Roy........

प्रिय अरुंधती ताई, नमस्कार !
       तसा आपला फारसा संबंध नाही अथवा आपली ओळखही नाही ! पण एकूणच लेखकाला आपल्याशी संवाद साधायला ओळख लागतेच असे दिसत नाही. शिवाय, आपण "लेखकांच्या आवाजावर बंधने" आणण्यास ठाम विरोध करणाऱ्या ! त्यामुळे थोडा संयमाचा बांध फुटला तरी, तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, हे समजून घेण्याइतपत उदात्तपणा आणि औदार्य आपण दाखवाल, याची मला खात्री आहे.....!!
       
     आणखी एक, तुम्हाला पत्राच्या सुरुवातीस "प्रिय" म्हणालो कारण, अजूनही आम्ही सुसंस्कृतपणा सोडू शकत नाही, अन स्त्रीचा सन्मान न राखणे ही आमच्या "स्वतंत्र आणि अभिव्यक्तीचा आदर राखणाऱ्या राष्ट्राची" शिकवणही नाही.
        
       तर, नमनाला घडाभर तेल घालून झाल्यानंतर आता मूळ मुद्द्यावर येतो. आपण परवा काश्मीर बद्दल अप्रतिम मुक्ताफळे उधळलीत.... काय तर म्हणे, " ऐतिहासिक दृष्ट्या काश्मीर हे अखंड भारताचा कधीही घटक नव्हते. हे सर्वमान्य आणि स्वयंसिद्ध सत्य आहे. { ??? } आणि हे सत्य सरकारनेही स्विकारले आहे... त्यामुळे काश्मीर मधील लक्षावधी जनतेची स्वतंत्र होण्याची इच्छा न्याय्य आहे...!!!! "
      
         फार आनंद वाटला... त्यातही हे विधान आपण श्रीनगर या शहरातून केलेत... त्याने अधिकच बरे वाटले. तुमची वाक्यरचना, शब्दांची निवड एक्दम फक्कड आहे.. फक्त काही गोष्टी तुमच्या नजरेतून निसटल्या ! त्यांची जाणीव करून देण्यापूर्वी, मला तुमचे अभिनंदन करावेसे वाटते... अखेरीस, भारत हे एक राष्ट्र आहे आणि ते अखंड आहे तसेच ऐतिहासिकदृष्ट्या हे सत्य आहे, हे आपण मान्य केलेत !!! केव्हढी मोठी क्रांती ही ? विचाराने कम्युनिस्ट असूनही असे आपण म्हणालात याने मला नितांत आनंद झाला.. आता एक गंमत सांगतो, ज्या श्रीनगरात बसून आपण हे विधान केलेत, त्या नगराला मौर्य साम्राज्यातील कर्तृत्ववान राजा सम्राट अशोक याने वसविले आहे... फक्त याला इतिहास म्हणता येईल का, हे मला निश्चित सांगता येत नाही... कारण तुमचा ऐतिहासिक कालखंड नेमका कधीपासून सुरू होतो, त्या बद्दल नेमकी एकवाक्यता नाही...
       
        आता आपल्या या विधानांबद्दल माझ्या या काही भाबड्या शंका... { बाय द वे, आम्हा पामरांच्या असतात त्या भाबड्या शंका... तुमची असतात ती अभ्यासपूर्ण मते, विवेकनिष्ठ विवेचने...... अल्पसंख्यांकांवर होतो तो अन्याय... बहुसंख्यांकांवर होतो तो त्यांच्या युगानुयुगांच्या चुकांचा परिणाम.... हे सत्य आता आम्हीही स्विकारले आहे.... }

अखंड भारताची नेमकी ऐतिहासिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या घटक असलेली राज्ये कोणती , ती यादी आपण प्रसिद्ध कराल का ? मूळात भारत अखंड होता, या आपल्या विधानात तो कधीपासून याचा उल्लेख नाही. आमच्या [गैर] समजूतीप्रमाणे १५ ऑगस्ट, १९४७ पर्यंत भारत हा एकसंध आणि अखंडच होता... शिवाय, ब्रिटिशांच्या भारतविषयक धोरणांमध्येही काश्मीरला वगळले गेल्याचे ऐकिवात नाही. अथवा तोपर्यंत पाकिस्तानचा तसेच काश्मीरचा उल्लेख ब्रिटिशांच्याही परराष्ट्र धोरणांमध्ये स्वतंत्रपणे आलेला नाही. म्हणजे, सम्राट अशोकापासून सुरू झालेली काश्मीरची भारतासह असलेली अखंडता आजपर्यंत कायम आणि एकसंध रहाते, अशी आपली आम्हा भारतीयांची श्रद्धा. आणि यालाच सर्वमान्य सत्य म्हणत असावेत.... कदाचित आपली सर्वमान्य या शब्दाची व्याख्या वेगळी असेलही, तर कृपया तीही स्पष्ट करावी...

          आता त्या पुढील मुद्दा : काश्मीर हे भारताचा एकसंध भाग नव्हते हे सरकारनेही स्विकारलेले सत्य आहे, असे आपण म्हणता ! आजवर काश्मीरचे राज्यपाल नेमके कोणी नेमले ? काश्मीर विषयक समस्या आणि तेथील खटले अंतिमतः कोणाच्या आणि कोणत्या न्यायालयापुढे चालविले जातात तसेच त्यासाठी कोणते दंडविधान वापरले जाते ? आजवर काश्मीरला आर्थिक निधी कोणी आणि कोणाच्या पैशांमधून दिला ? काश्मीरमध्ये निवडणूका कोणाच्या देखरेखी-खाली होतात ? फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला हे पितापुत्र भारताच्या केंद्रिय मंत्रीमंडळात होते, ते काश्मीर हा ऐतिहासिकदृष्ट्या भारताचा भाग नाही म्हणूनच नाही का ? { ग्लोबलायझेशन मुळे आता कोणत्याही देशाचा नागरिक कोणत्याही देशाच्या मंत्रीमंडळात जातो का , आणि असे असल्यास राष्ट्र ही संकल्पना न मानणाऱ्या कम्युनिस्टानी याविरोधत काही आंदोलन केले आहे का , हा प्रश्न विचारण्याचा मोह मी टाळतो आहे... }

         या साऱ्या प्रश्नांवर मला समाधानकारक उत्तरे सापडू शकली नाहीत. आणि या साऱ्यानंतरही, काश्मीर हे भारताचे नव्हते हे सरकारने स्विकारलेले सत्य आहे असे म्हणायचे धाडस करता येईल का ? तशा बाई तुम्ही धाडसी आहात.... तुम्ही कदाचित धाडस करालही ! नव्हे खर तर केलेही !!!

         आता त्यावर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रियांवरही आपण आपले थोबाड उसकटलेच आहे.... राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, शिवसेना अशा तथाकथित "उजव्यां"नीच नाही तर सत्तधारी काँग्रेसनेही आपण आपली विधाने मागे घ्यावीत असे सांगत, अन्यथा कायद्याद्वारे आपल्याविरोधात कारवाई केली जाईल असे "सुचविले" आहे. त्यावर आपण काय मुद्दा उपस्थित केला आहे, व्वा !!!!!
आपण म्हणता की, "मी तर लक्षावधी काश्मिरींच्या भावनाच व्यक्त केल्या... अन या देशात न्यायाला - न्यायासाठी झगडणऱ्याला काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही ?... उलट एका लेखकाच्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्राची अशी गळचेपी करणाऱ्या राष्ट्राची मला कीव येते... ज्या देशात लूटारू, बलात्कारी, जातीय दंगली माजविणारे, सांप्रदायिक अशी माणसे उजळ माथ्याने फिरतात, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या एका लेखकाविरुद्ध अटकेची भाषा वापरली जाते, अशा देशाची मला कीव येते..."
  
         लक्षावधी काश्मीरींच्या भावना व्यक्त करणाऱ्या तुमच्या सारख्या लेखिकेला लक्षावधी काश्मिरी पंडितांच्या भावना, त्या विस्थापितांचे दुःख, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न याबद्दल काहीच वाटू नये ? भारताच्या ईशान्येकडील अरूणाचलसह इतर राज्ये चिनी अत्याचाराबद्दल, चीनच्या संभाव्य आक्रमणांबद्दल बोलतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटू नये ? [ कदाचित आपल्या अखंड भारतामध्ये या गोष्टी येत नसाव्यात....] आजवर विविध दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील अनेक स्त्रीया विधवा झाल्या, अनेकांचे पालकछत्र हरविले, अनेक कुटुंबे उघड्यावर आली त्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटू नये ?  इतकंच काय, पण इस्लामी देशामध्ये होणाऱ्या स्त्रीयांवरील अत्याचारांबद्दल आपण गुळणी धरून बसता ? शेजारच्या चीनमध्ये, सॉरी, कम्युनिस्ट चीनमध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या "लेखकाला" तुरुंगात डांबले आहे - त्याच्या पत्नीला नजरकैदेत ठेवले आहे याबद्दल आपण काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही ? [की आपल्या विधानाद्वारे भारताची सर्वात मोठी लोकशाही ही प्रतिमा आपल्याला "तेजस्वी" करायची आहे ?]  Is this your "algebra of infinite justice ?"

       आपण बूकर पारितोषिकविजेत्या लेखिका आहात ! आपल्या मताला नाही म्हटलं तरी जगात काही किंमत आहे ! [ की कोण काळं कुत्र आपल्याला हिंग लावून विचारणार आहे, असा तुमचा समज आहे ? ] अशावेळी निदान भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचा {preamble} तरी विचार करा. त्यामध्ये स्वातंत्र्याचे घटक क्रमाने नमूद केले आहेत. तो क्रम असा : विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना.... अपेक्षा ही आहे की, आधी विचार करावा आणि मगच त्याची अभिव्यक्ती [expression] व्हावी..... पण किर्केगार्द नावाचा एक विचारवंत एक विधान करून गेला होता... तो म्हणाला की माणसे विचारस्वातंत्र्याचा उपयोग क्वचितच करतात पण त्याबदल्यात त्यांना उच्चारस्वातंत्र्य मात्र हवे असते.... आपण डॉ. बाबासाहेबाना खरे ठरवू इच्छिता की किर्केगार्दला ? आपण आपल्या लेखनातून God of Small Things लोकाना दाखविला होता..... मग आता आपण चीनचा पोपट असल्यासारख्या का बोलता आहात ?

           ज्या भारतीय घटनेचा दाखला आपण लेखन स्वातंत्रासाठी देता, त्या भारतीय घटनेमध्येच अभिव्यक्ती स्वातंत्राबद्दल हे नमूद केले आहे की, देशाची अखंडता-एकात्मता आणि सार्वभौमत्व यांना बाधा येणार नाही अशा अभिव्यक्तीला स्वातंत्र्य आहे.... मग ही "स्मॉल थिंग" आपण कशी काय विसरता ?
फार बोललात बाई....! एक बुकर पारितोषिक मिळाले आहे... आता त्याच देशातील जनतेकडून "बुक्क"र पारितोषिक घेऊ नका.... !

       आणि हो.... अखंड भारताच्या इतिहासात काश्मीरसह विद्यमान पाकिस्तानचाही समावेश होता - आहे आणि शाश्वत राहील ! त्यासाठी तुमच्या परवानगीची देशाला आणि "Millions of Kashmiree"ना गरज नाही...

   जय हिंद !!!!


अखंड भारताचा {कारण मी आपला/ तुमचा असले शब्द येथे वापरू इच्छित नाही} मनस्वी नागरिक,
स्वरुप पंडित




p.s. : 

* २६ ऑक्टोबर, १९४७ हा काश्मीर भारतात विलीन झाला तो दिवस !!!!
त्याच दिवशी अरुन्धती रॉय बरळल्या !


* १३ डिसेंबर, १९४६ ह्या दिवशी भारताच्या सार्वभौम संसदेमध्ये संविधान निर्मितीच्या उद्दिष्टांचा [preamble] ठराव मांडला गेला.
१३ डिसेंबर, २००१ या दिवशीच भारतीय संसदेवर हल्ला झाला.


* २६ नोव्हेंबर, १९४९ या दिवशी आपण भारताची राज्यघटना स्विकारली.
२६ नोव्हेंबर, २००८ या दिवशीच कसाब आदींनी भारतावर हल्लाबोल चढविला....



या तारखांमधील साधर्म्य हा केवळ योगयोग मानता येईल का ?